हिंदू जागृती न्यास हा रजिस्टर्ड ट्रस्ट ठाणे, पालघर, रायगड व नगर जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करीत आहे. उपरोक्त मंडळाच्या वतीने मोखाडा, जव्हार व विक्रमगड या ठाणे-पालघर जिल्ह्यातील वनवासी गावांतील ८० पाड्यांवर गेली २० वर्षे बालवाडी प्रकल्प चालविला जात आहे. ३.५ ते ६ या वयोगटातील १८०० बालकांना निसर्ग, परिसर, विज्ञान व गणित या विषयांवर आधारित (हातात पाटी-पेन्सिल न घेता) द्यावयाची २ वर्षांच्या अभ्यासक्रमाची पुस्तिका तयार केली आहे.
या ८० गावातील वनवासी महिला निवडूनच तिला महिन्यातून दोनदा विशेष प्रशिक्षण देण्यास ठाण्यातील पूर्वप्राथमिक शिक्षणातील ५ अनुभवी शिक्षिका जात असतात.शिक्षणा बरोबरच या मुलांची शारीरिक तंदुरुस्ती राहावी, यासाठी तांदूळ, मूग, उडीद, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, शेवग्याचा पाला, मेथीदाणे, शेंगदाणे, गूळ, ओले खोबरे, मोहाची फुले, गरम मसाला, सांडगे, साजूक तूप, खुरासणी तिळाचे तेल घालून तयार केलेली पौष्टिक खिचडी आलटून पालटून दिली जाते. यापुढील काळांत अन्यही काही प्रकल्प संकल्पित आहेत .

१) गर्भिणी व स्तनदा मातांसाठी
मूल जन्मल्यापासून किमान २ वर्षेपर्यंत त्याची वाढ संतुलित व झपाट्याने होण्यासाठी खालील २ कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे -
अ) वनवासी भागातील गर्भिणी व स्तनदा मातांना २ वर्षे पोषक आहार बिस्किटे (गोड व खारी) देणे खपली गहू, बार्ली, नाचणी, मूग, उडीद, राजगिरा, (अश्वगंधा, शतावरी, अनंतमूळ), (मामेरी बदाम, काळा खजूर, पिस्ता, जरदाळू, अक्रोड), लोणी, साजूक तूप ,खारी चव - सैंधव ,जीरं,मिरं गोडी चव - खांडसरी साखर/सेंद्रिय गूळ उपयोग -९ महिने गर्भाची वाढ उत्तम व प्रसूतीनंतर वर्षभर भरपूर दूध , त्यामुळे आई व बाळाला भरपूर पौष्टिक तत्त्वे , आवश्यक ती क्षार , मिनरल्स मिळतील व निरोगी राहतील - मात्रा सकाळी व संध्याकाळी ४-४ बिस्किटे
ब) गायीच्या प्रसूतीनंतरच्या २ दिवसातील चीक दुधामध्ये ३५-४०% रोगप्रतिकारक्षमता निर्माण करणारी प्रोटिन्स (इम्युनोग्लोब्युलीन्स) असतात, पितांबरी कंपनीच्या सहकार्याने २ वर्षे संशोधन करून या चिकदुधाची विशिष्ट तापमानाला पावडर करून त्याची ८० mg ची गोळी बनवली जाते, सध्या पालघर जिल्ह्यातील वनवासी गावातील आंगणवाड्यांवर ही गोळी दिली जात आहे . गोपीयूष गोळ्यांमध्ये बडीशेप अर्क घालून ट्रस्ट नव्याने गोळी बनवून घेत आहे.
• बडीशेप ही पाचक व वात-पित्तघ्न आहे, त्यामुळे गोपीयूष लघु होऊन, पचन होऊन अंगी लागायला मदत होईल.
• गोळीला स्वाद येईल व बडीशेपेची गोळी अशा सोप्या व परिचित नांवाने प्रसिद्धी होईल.
• बडीशेप शीतल असल्याने शुद्ध कफाची निर्मिती अधिक होऊन मुलाचे वजन,उंची वाढणे, अधिक भूक लागणे, पचन व्यवस्थित होणे व रोगप्रतिकार क्षमता वाढणे, हे गुण दिसतील. पित्ताचा दुर्गंधी (विस्र) गुण कमी होऊन रक्तप्रसादन होऊन मुलांची कांती उजळेल.(थोडी गोरी होतील)
वरील प्रमाणे गोपीयूष गोळी व २ वर्षे गर्भिणी व स्तनदा मातांना पोषक बिस्किटे देऊन दर महिन्याला उंची, वजन, दर ३ महिन्यांनी रक्त चाचणी असा डेटा ठेवणे यासाठी वनवासी शिक्षकांना उचित प्रशिक्षण देण्याचा हा प्रकल्प आहे.

सदर प्रकल्पासाठी
• प्रशिक्षण व प्रवास
• प्रत्यक्ष गोपीयूष गोळी व पोषक बिस्किटे व
• डेटा संग्रहासाठी सामग्री व अन्य व्यवस्था
• आवश्यक मानधन
असा खर्च अपेक्षित आहे.

२) जलदान
अजूनही ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक वनवासी गावांत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची गंभीर समस्या आहे. अनेक गावातून मार्च ते मे महिन्यापर्यंत डबऱ्यातील पाणी पिण्याची पाळी येते, अशी २५० गांवे निश्चित केली असून गरज व उपलब्धतेप्रमाणे कूपनलिका (पंप व टाकी सहित), चेक डॅम युक्त कूपनलिका, उपलब्ध स्रोताकडून पाईप लाईन व जलकुंभ अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प आहे.

३) दीपदान
ग्रामीण विद्युतीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असले तरीही सर्व रिमोट वनवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचलेली नाही . अशी गांवे निश्चित करून प्रत्येक घरी सोलर दिवे व आवश्यक त्या ठिकाणी पाड्यातील घरांच्या संख्येनुसार २-३ KVA चे सोलर पॅनेल उभारून ऑफ/ऑन लाईन विजेची व्यवस्था उभारून देण्याचा प्रकल्प आहे, सध्या मुरबाड, शहापूर, ठाणे, पालघर व रायगड जिल्यातील ६५ गांवे निश्चित केली आहेत.

४) वेदशाळा
चतुर्वेद ही भारताची सांस्कृतिक धरोहर आहे, ४ वेदांच्या पठण पद्धतीनुसार १३०४ शाखा होत्या , पण पठण व पाठणाच्या अभावी फक्त १३ शाखा शिल्लक आहेत. त्यापैकी ऋग्वेद व कृष्ण यजुर्वेदाच्या एक-एक शाखेसाठीच्या अध्ययना साठी एक वेदशाळा सुरू करण्याचा संकल्प केला आहे. एक वेद, त्याची षडंगे व प्रातिशाख्यासह मुखोद्गत करण्यासाठी १० वर्षे लागतात. सध्या वय वर्षे ८ पूर्ण केलेल्या २५ मुलांस प्रवेश देऊन , त्यांना आधुनिक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासह सदर वैदिक शिक्षणही देण्यात येणार आहे . अशा १२ वी पर्यंतच्या लौकिक शिक्षणासह १० वर्षांचे वैदिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश महिन्यापासून शिक्षणअखेर पर्यंतच्या कालावधीत दरमहा रु.५००/- विद्यावेतन देखील देण्याची योजना आहे , ज्यायोगे २० व्या वर्षी बाहेर पडल्यावर त्या विद्यार्थ्यांच्या गाठीशी काही पुंजी देखील राहील . सदर १२ वर्षांचा निवास,भोजन,वस्त्र व शिक्षणाचा खर्च निःशुल्क राहणार आहे.

५) अन्नदान
सध्या ठाणे,पालघर,नगर व रायगड जिल्ह्यातील १९ वसतिगृहे व आश्रमशाळा याना गेल्या दीड वर्षात रु.१७ लाखाचा किराणा पुरविला गेला आहे . ही योजना विस्तारित करत मार्च,जून,नोव्हेंबर अशा ३ महिन्यांत त्या त्या वसतिगृहाकडून त्यांना आवश्यक लागणाऱ्या किराणा मालाची यादी मागवून ती त्यांना पोचविली जात आहे . ठाण्यातील अनेक दानशूर व विशेषतः अन्नदान या विषयातील रस असलेल्या व्यक्ती व संस्था यामध्ये सहाय्य करत आहेत.

६) शैक्षणिक
खुल्या प्रवर्गातील अनेक हुशार पण गरीब विद्यार्थी केवळ फीचे पैसे नाहीत म्हणून उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ठाण्यात कार्यरत असलेल्या सेवा सहयोग फाउंडेशन च्या सहकार्याने अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी सहाय्य करण्याची/नियमित शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे.

वरील उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. न्यासाला CSR रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे. तरी, आपल्या वार्षिक अनुदानातून किंवा CSR फंडातून हिंदू जागृती न्यासाला रु.२५ लाख निधी उपलब्ध व्हावा, ही नम्र विनंती.

आपले स्नेहांकित,
हिंदू जागृती न्यास